मुंबई : मुंबई विद्यापीठात तब्बल 111 कोटींच्या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई विद्यापीठात मोठा आर्थिक घोटाळा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुलगुरु डॉ. संजय देशमुखांनी या ठेवी मुदतीपूर्वीच वटवल्यानं या आर्थिक व्यवहारांची चर्चा सुरु झाली आहे.


मुंबई विद्यापीठाच्या आर्थिंक व्यवहारांबाबत आरटीआयमधून माहिती मागवण्यात आली होती. यात जुलै 2015 ते मे 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली. या आकडेवारीमधून तब्बल 111 कोटींची रक्कम मुदतीपूर्वीच उचलल्याचं स्पष्ट झालं आहे. ही रक्कम मुदतीपूर्वीच उचलल्यानं मुदतीच्या काळात मिळणाऱ्या व्याजावरही विद्यापीठाला पाणी सोडावं लागलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलींनी ही बाब समोर आणली आहे.

अतिरिक्त अर्थसंकल्पाचे आकडे फुगवणाऱ्या विद्यापीठाची नियोजनशून्यतेमुळे अवस्था फार बिकट झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.