कल्याण : अंबरनाथमधील एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर हल्ला चढवणारा तरुण प्रवीण गोसावी याची अखेर दीड महिन्यांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. कारागृहातून सुटल्यानंतर रामदास आठवले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीती प्रवीण गोसावी याने व्यक्त केली आहे.


प्रवीण गोसावी हा आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीचा पदाधिकारी होता. मात्र पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्याने पक्षाला रामराम ठोकला. यानंतर 8 डिसेंबर रोजी अंबरनाथमध्ये झालेल्या रामदास आठवलेंच्या सभेत त्याने रामदास आठवलेंवर हल्ला केला. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती.


तेव्हापासून गोसावी या आधारवाडी तुरुंगात होता. तब्बल अडीच महिन्यांनंतर गोसावी याची सुटका झाली आणि त्यानंतर त्याने आपली बाजू स्पष्ट केली. रामदास आठवले हे आंबेडकरी जनतेची मते घेतात, मात्र घरोबा आरएसएस सोबत करतात, त्यामुळे आंबेडकरी युवक म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल राग असल्याचं गोसावी म्हणाला. तसेच आता आठवले आणि त्यांचे समर्थक यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही त्याने व्यक्त केली.