मुंबई : मी तोंड उघडलं, तर शरद पवारांची पळताभूई थोडी होईल असा इशाराच भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. आज मुंबईतील भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात बोलताना त्यांनी राष्ट्रवादीपेक्षा डाव्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.


शरद पवार हे जातीयवादी आहेत, म्हणूनच त्यांच्यासोबत संविधान बचाव रॅलीत सहभागी झालो नाही, अशी जाहीर टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याचवेळी राष्ट्रवादीसोबत जाण्यापेक्षा डाव्यापक्षांसबोतच राहू अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली. भारिप बहुजन महासंघाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात आज ते बोलत होते.

2001 साली एनसीपीकडेच गृहमंत्रीपद होते. त्यावेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या संघटनेवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.