मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 27 तरुणांना नोटीस पाठवली आहे आहे. फेसबुकवरील ‘देव गायकवाड’ फेक अकाऊंट प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या तपासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी या नोटिसा आहेत.


काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील ‘देव गायकवाड’ नावाच्या फेक अकाऊंट प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी काही जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील निधी कामदार यांनी याविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार केली होती.

सायबर सेलमध्ये या प्रकरणी गुन्हा क्र. 109/2017 नुसार भादवि कलम 419, 420, 465, 468, 469, 471 आणि 354D, तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66C, 66D आणि 67 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दुसरीकडे, महेंद्र रावले यांसह काही जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मुंबईतील कांजुरमार्ग पोलिस ठाण्याने बजावली आहे. पोस्टमुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, ही कारवाई म्हणजे आणीबाणी असून, सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

“राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांचे भ्रष्ट्राचार या विरुद्धचा जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारकडून पोलिसी बळाचा गैरवापर सुरु आहे. पोलिसांनी निवडून पत्रकारांना बोलावणं व चौकशीच्या नावाखाली धमकावणं, ही दुसऱ्या आणीबाणीची चाहूल आहे. पत्रकारांना धमकावणं सरकारला महाग पडेल.”, अशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निषेध केला आहे.

या तरुणांमध्ये पत्रकार ब्रम्हा चट्टे, मानस पगार, आशिष मेटे, श्रेणिक नरदे, योगेश वागज, सचिन कुंभार आणि महेंद्र रावले यांसह काही जणांचा समावेश आहे.