मुंबई : मुंबईत जिथं पोलिसांचीच वाहनं सुरक्षित नाहीत, तिथं सर्वसामान्यांची काय व्यथा?, असा सवाल उपस्थित झाला आहे. भोईवाडा पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नायगाव पोलीस वसाहतीतून शैलेश पवार या ट्राफिक हवालदाराची दुचाकी चोरीला गेली आहे.


शैलेश पवार हे दिंडोशी वाहतुक विभागात हवालदार पदावर कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून नेहमीप्रमाणे ते घरी परतले आणि इमारत क्रमांक 4 च्या खाली त्यांनी आपली दुचाकी पार्क केली. पवार हे याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतात.

शनिवारी सकाळी उठून पाहिल्यावर दुचाकी जागेवर नसल्याचं त्यांच्या निर्दशनास आलं. सर्वत्र शोधाशोध करूनही बाईक सापडेना तेव्हा त्यांनी अखेरीस भोईवाडा पोलीस स्टेशनवर बाईक चोरीची रितसर तक्रार नोंदवली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत दररोज 8 वाहनं चोरीला जातात. 1 जानेवारी 2017 ते 30 सप्टेंबर 2017 याकाळात मुंबईत 2160 वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मात्र यातील केवळ 644 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे.