पीएनबी घोटाळा : अटकेविरोधात महिलेची हायकोर्टात धाव
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 05 Mar 2018 08:59 PM (IST)
कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही आणि आपल्याला करण्यात आलेली अटक ही रात्री 8 वाजता करण्यात आल्याने ती बेकायदेशीर आणि घटनाविरोधी असल्याचा आरोप मणकीकर यांनी आपल्या याचिकेत केला आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या एका महिलेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. कविता मणकीकर असं या महिलेचं नाव आहे. कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही आणि आपल्याला करण्यात आलेली अटक ही रात्री 8 वाजता करण्यात आल्याने ती बेकायदेशीर आणि घटनाविरोधी असल्याचा आरोप मणकीकर यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या प्रकरणावर आता 12 मार्चला न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. मणकीकर या नीरव मोदीच्या कंपनीतील कर्मचारी आहेत. त्यांना 20 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला फसवत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. पीएनबी घोटाळा समोर आल्यापासून नीरव मोदी परदेशात फरार आहे. सीबीआय आणि ईडीकडून घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांच्या कंपन्यांवर कारवाई सुरु आहे. शिवाय त्यांची अनेक ठिकाणची मालमत्ताही जप्त करण्यात आली. चौकशीसाठी काही कर्मचाऱ्यांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.