मुंबईतील पाईपलाईनजवळील झोपड्यांसाठी काँग्रेस आमदार हायकोर्टात
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई | 13 Nov 2017 08:43 PM (IST)
मुंबई उच्च न्यायालयानं पाईपलाईनलगतच्या सर्व बेकायदेशीर झोपड्यांवर दुसऱ्या टप्यातील कारवाई 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन भोवतालीच्या झोपडपट्ट्या वाचवण्यासाठी काँग्रेस आमदार नसीम खान सरसावले आहेत. नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघातील मिलिंद नगर, उदय नगर आणि पवई परिसरातील पाईनलाईनला लागून असलेल्या बेकायदेशीर झोपड्यांवर पालिकेनं कारवाई सुरु केली आहे. मात्र या झोपडीधरकांनी पालिकेला साल 2000 पूर्वीपासूनच्या वास्तव्याचे दाखले दिले असूनही त्यांचं म्हणणं न ऐकताच पालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आहे असा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच सध्या मुलांच्या परिक्षांचा काळ असल्यानं तुर्तास कारवाई थांबवण्यात यावी अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय अधिकृत झोपडीधारकांचं तातडीनं चेंबूर येथं पुनर्वसन करावं अशीही मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तातडीनं सुनावणीसाठी ही याचिका मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे मांडण्यात आली, मात्र हे आदेश न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले असल्यानं त्यांच्यासमोरच ही याचिका मांडण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेत. त्यानुसार मंगळवारी या याचिकेवर पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयानं पाईपलाईनलगतच्या सर्व बेकायदेशीर झोपड्यांवर दुसऱ्या टप्यातील कारवाई 31 डिसेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.