मुंबई : नालासोपाऱ्यात आठवड्याभरापूर्वी पोलीस चकमकीत ठार झालेल्या जोगिंदर राणा याला बनावट चकमकीत मारल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत त्यांनी याचिका दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 20 जुलैच्या दुपारी जोगिंदर राणा याला चकमकीत ठार केले होते.


मात्र ही चकमक खोटी होती आणि पोलिसांनी नियोजनबद्धरित्या त्याची हत्या केल्याचा आरोप त्याचा भाऊ सोनू राणा यानं याचिकेत केला आहे. मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोघांवर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा, या दोघांसह त्यांच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल लोकेशन आणि सीडीआर तपासण्यात यावेत. तसेच या घटनेची सीबीआय अथवा एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी हायकोर्टाकडे करण्यात आली आहे.

जोगिंदर राणाने पोलीस हवालदारावर चाकूने हल्ला केला, असे पोलीस सांगतात. जर माझ्या भावाने चाकूने हल्ला केला तर चाकूला रक्त का लागले नव्हते?, असा सवाल सोनू राणा यांनी केला. हल्ल्यात पोलीस हवालदार मनोज सकपाळ जखमी होऊन अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे पोलीस सांगतात. मात्र तो छायाचित्रात घटनास्थळी उभा आहे, बुटाची लेस बांधत असताना दिसत आहे.

तसेच मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ या दोघांनीच राणाचा मृतदेह रिक्षात घालून नेतानाचे व्हिडीओ पुरावे आपल्या जवळ आहेत, असे सोनू यांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरातील दुकानदारांना धमकावून सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आला.

माझ्या भावाने गुन्हेगारी विश्व सोडले होते आणि तो चालक म्हणून काम करत होता. मात्र त्यादिवशी या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी आधी राणाकडे पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.

जोगिंदर राणा ऊर्फ गोपाल राणा याची नालासोपारा पूर्वेच्या राधानगर येथे पोलीस चकमकीत हत्या करण्यात आली होती. राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात 37 गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांश गुन्ह्यांत तो शिक्षा भोगून आला होता.