मनपा आयुक्तांच्या बदलीविरोधात ठाण्यात एक मिनिटाचा ‘ब्लॅकआऊट’
एबीपी माझा वेब टीम | 01 Mar 2018 10:58 PM (IST)
ठाण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी काही काळ ठाण्यात राहावे यासाठी प्रशासन आणि सरकार दरबारी या इमारतींमधील नागरिक विनवणी करणार आहेत.
ठाणे : एकीकडे होळीचा सण राज्यभर उत्साहात साजरा करत असताना, ठाण्यात मात्र होळीच्या दिवशी एक मिनिटासाठी ब्लॅकआऊट म्हणजेच इमारतींमधील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात आला. कर्तव्य दक्ष ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठिंब्यासाठी ठाणेकरांनी अनोख्या पद्धतीने निदर्शनं केली. ठाण्यात गेले तीन वर्षे विकासाची गंगा आणणारे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर काही लोकांनी आरोप केले होते. याविरोधात आता सर्वसामान्य ठाणेकर रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आयुक्तांनी काही काळ ठाण्यात राहावे यासाठी प्रशासन आणि सरकार दरबारी या इमारतींमधील नागरिक विनवणी करणार आहेत. संजीव जयस्वाल ठाण्यात उत्तमरित्या काम करत असून ठाण्याचा विकास खऱ्या अर्थाने त्यानी केला आहे, असे मत ठाणेकरांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आयुक्तांवर वैयक्तिक आरोप करण्यात आले होते. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून चांगले काम करणाऱ्या आधिकाऱ्याच्या मागे काही समाजकंटक काम करत असतात, परंतु आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खचून न जाता काम करीत राहावे असे मत ठाणेकर नागरिकांनी व्यक्त केले.