मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड (पूर्व द्रुतगती मार्ग), एलबीएस मार्ग (मुलुंड) व दहिसर या टोल नाक्यावरुन मासिक पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता फास्टॅग मधेच मासिक पास मिळणार आहे. या योजने बाबत सह व्यवस्थापकीय संचालक  विजय वाघमारे यांनी सांगितले की, टोल नाक्यावर प्रत्यक्ष जात रोख रक्कम देऊन मासिक पास खरेदी करण्याच्या पूर्वीच्या पद्धतीत बदल करुन त्या ऐवजी बँकेस ऑनलाईन पद्धतीने पासची रक्कम हस्तांतरण करून फास्टॅगच्या द्वारे मासिक पास घेता येईल व फास्टॅग साठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) मधून प्रवास करता येईल व वाहनधारकांना विना थांबा टोल नाका पास करता येईल. तसेच यापुढे मासिक पास फक्त फास्टॅग असलेल्या वाहनांनाच मिळेल ज्या वाहनधारंकाकडे फास्टॅग नसेल त्यांनी प्रथम फास्टॅग घेणे आवश्यक आहे.
 
म.रा.र.वि.महामंडळ, आयसीआयसीआय बँक व मे. एमईपी एन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. (कंत्राटदार) यांच्यामध्ये झालेला करारानुसार ही सुविधा देण्यात येणार आहे. वाहनधारकासाठी ऑनलाईन पद्धतीमध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. पहिला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे संकेतस्थळ www.nhai.org व दुसरा पर्याय icicibankfastaglogin द्वारे मासिक पासची रक्कम बँकेस हस्तांतरण करता येते व मिळणाऱ्या पावतीवरील Authorization क्रमांक संबधित टोल नाक्यावर 3 दिवसाचे आत जाऊन त्यानुसार मासिक पास कार्यान्वित करुन घ्यावा लागेल. मुदतीत कार्यन्वित न केल्यास पास आपोआप रद्द होऊन तेवढी रक्कम वाहन धारकाचे खात्यात परत जमा होईल.


FASTag ची सक्ती म्हणजे लोकांच्या अधिकारावर गदा नाही, केंद्र सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र


टोल प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक, कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेमुळे साधारणपणे 22 हजार ते 25 हजार वाहन धारकांना या सुविधेचा फायदा होणार आहे. तसेच मुंबई टोल नाक्यावरील गर्दीच्या वेळेची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदतच होईल. मुंबई प्रवेश द्वारावरील 4 टोल नाक्यावर दोन्ही बाजूस फास्टॅगसाठी आरक्षित मार्गिका (Dedicated FASTag Lane) उपलब्ध केल्यामुळे फास्टॅग वाहनधारकाची संख्या सतत वाढत असून वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होत आहे.


टोल नाक्यावर FASTag मध्ये पैसे असतानाही जर तो स्कॅन झाला नाही तर पैसे देण्याची गरज नाही, वाचा नवीन नियम


राजीव गांधी सागरी सेतूवरील दोन्ही बाजूच्या सर्वच मार्गिका फास्टॅग लेनमध्ये बदलण्याचा 26 जानेवारीचा पहिला प्रयोग यशस्वी झालाआहे. त्यानुसार वाशी, ऐरोली येथील टोल नाक्यावर सर्व मार्गिका फास्टॅग मध्ये रुपांतरीत करणेचे काम सुरु असून येत्या काही दिवसात सर्व मार्गिकामध्ये फास्टॅग यंत्रणा कार्यन्वित होईल व त्यामुळे मुंबई नाक्यांवर वाहनधारकांना होणारा त्रास नक्कीच कमी होईल.