मुंबई : ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली आहे. तर सध्या राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे आता नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता परमबीर सिंह यांची बदली झाली आहे.


पोलीस दलाबाबत सरकारचा मोठा निर्णय
- हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त
- रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार
- संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी
- परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जबाबदारी






मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी का?


1. देशातील सर्वात सक्षम पोलीस दल म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबई पोलिसांनी अंबानी बॉम्ब धमकी प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे.  ज्यामुळे मुंबई पोलिसांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत आहे. म्हणूनच मुंबई पोलीस प्रमुखांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालं होतं.


2. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही माहिती कशी पोहोचली? पोलिस दलातील आजही अनेक अधिकारी या प्रकरणातून फडणवीस यांना माहिती पोहोचवत असल्याची बाब समोर आली आहे. मनसुख हिरण यांच्या मृत्यूपासून ते मानसुखच्या पत्नीच्या जबाबापर्यंत सर्व माहिती लीक झाली. हा प्रश्न सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पडला होत. यातही पोलीस आयुक्तांचे काहीच नियंत्रण नाही ते स्पष्ट झालं होतं.


3. गृहमंत्रालय राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. त्यामुळे शरद पवार आपली प्रतिमा बिघडू देऊ इच्छित नाही. अशा परिस्थितीत तातडीने डॅमेज कंट्रोल म्हणून पोलीस आयुक्तांना हटवण्याचा विचार केला होता.


4. अंबानी धमकी प्रकरणामुळे देश आणि विशेषत: महाराष्ट्राच्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. अंबानींच्या सुरक्षेच्या वादामुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच, पोलीस आयुक्तांची उचलबांगली करुन कडक संदेश देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल.


कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी मास्टर्स केलं आहे.1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडे सध्या महासंचालकपदाची (कायदे व तांत्रिक विभाग) जबाबदारी आहे. त्यासोबतच त्यांना महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.


नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. 


रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.


2016 मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता.


नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना 2018 साली नगराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता. त्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. विधान परिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा नियम आहे. हा नियम मोडल्याबद्दल नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.