पालघर : पालघर जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे आणखी तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या आधी दोन अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. सध्या या प्रकरणी पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबन केलं असून 35 जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत


गडचिंचलेसह आजूबाजूच्या गावातील लोकांच्या जमावाने चोर असल्याच्या संशयातून दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची हत्या केली होती. यानंतर कासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एका पोलीस उप निरीक्षकाला तात्काळ निलंबित केलं होतं. आज पुन्हा एएसआय साळुंखे, हवालदार संतोष मुकणे, नरेश धोडी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करुन पोलीस अधीक्षक गौरव सिंग त्यांच्या निलंबनाचे आदेश यांनी दिले आहेत.


आतापर्यंत या प्रकरणात दोन अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. मंगळवारी (28 एप्रिल) याच प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कासा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या 35 पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत बदली केली.


Palghar mob lynching | गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणानंतर कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या


दरम्यान या हत्याकांडातील 110 आरोपींना घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पकडण्यात आलं आहे. इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर पोलीस दल ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत.


चोर समजून तिघांवर हल्ला
मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरुन आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 च्या सुमारास पोहोचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ 10.30 च्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले. मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली.


#पालघर : झुंडीच्या विकृतीचे बळी


पालघर हत्याकांड | चार ड्रोनच्या माध्यमातून जंगलात फरार झालेल्या आरोपींचा शोध


Palghar Mob Lynching | 'मी' त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही :सरपंच चित्रा चौधरी