भिवंडी : भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला घेउन जाणारी रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने ही दुदैवी घटना घडली.


भानसिंग दयाल (वय 50 वर्ष) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. मूळचे नेपाळ येथील रहिवासी असलेले भानसिंग दयाल हे वालशिंद गावात राहत होते. भानसिंग हे एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते.

भानसिंग दयाल हे घरासाठी लागणारे काही साहित्य आणण्यासाठी रस्ता ओलांडून पलीकडे जात होते मात्र तेवढ्यात एका अज्ञात वाहनचालकाने भानसिंग दयाल यांना उडवले. लगेचच त्यांच्या मित्रांनी भानसिंग यांना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता भिवंडी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रस्त्यात असलेल्या वाहतूक कोंडीमुळे भानसिंग जखमी यांचा मृत्यू झाला. तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांना उपचार वेळेवर न मिळाल्याने भानसिंग दयाल यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

विशेष म्हणजे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीसाठी एक महिना या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली असून गुजरातच्या दिशेकडून  पुणे ,ठाणे दक्षिण भारत, मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक वसई- चिंचोटी -भिवंडी  व वाडा- भिवंडी मार्गे  वळविण्यात आली आहे . त्यामुळे भिवंडी तालुक्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.