मुंबई : विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेत पुरवणी देण्यात येणार नाही, असा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ऑनलाइन मूल्यांकनादरम्यान पुरवण्या गहाळ झाल्याने हजारो विद्यार्थ्यांचे निकाल अजूनही रखडले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून 80 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 40 पाने पुरेशी असल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे.


मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना 80 गुणांची प्रश्नपत्रिका देण्यात येते, तर 20 गुण प्रॅक्टिकल, प्रोजेक्टसाठी देण्यात येतात. 80 गुणांच्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी बहुतांशी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची 40 पाने पुरत नसल्याने ते पुरवणी घेतात.

मात्र यावर्षी विद्यापीठाने राखून ठेवलेल्या 2300 विद्यार्थ्यांच्या निकालात पुरवणी गहाळ झाल्याचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळेच यापुढे पुरवणी न देण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केलं.

याबाबत महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना परिपत्रक पाठवले असून, द्वितीय सत्राच्या परीक्षांसाठी कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना पुरवणी देण्यात येणार नाही, असे जाहीर करण्यात आलं आहे.