खरंतरं मुंबईच्या रस्त्यांवर आज वाहनं चालवण्यास जागा नाही, अशी परिस्थिती असताना पार्किंगची समस्या हा गंभीर मुद्दा बनला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून सकारात्मक योजना अपेक्षित असताना राज्य सरकारच्यावतीने फ्लायओव्हरच्या खाली ‘नो पार्किंग झोन’ घोषित करून स्वत:चं अंग काढून घेतलं आहेत.
यासंदर्भात मुंबईतील रहिवासी प्रणव पोळेकर यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचा दावा होता की, फ्लायओव्हरखाली वाहनतळ उभारणं ही मुंबईकरांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखं आहे. दहशतवाद्यांनी मनात आणलं तर मोठा घातपात होऊ शकतो. या प्रकरणाची गंभीर दखल घेत हायकोर्टानं राज्य सरकारला यासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारच्या या उत्तरानंतर याचिकाकर्त्याचा याचिका दाखल करण्यामागचा हेतू साध्य झाल्याने हायकोर्टाने ही याचिका निकाली काढली.