गुंड राजकारणात येऊन सुधरत असतील, तर त्यांना संधी द्या : आठवले
एबीपी माझा वेब टीम | 15 Jan 2017 08:41 PM (IST)
उल्हासनगर : मी गुंडांच्या विरोधात आहे. मात्र, गुंड राजकारणात येऊन सुधरत असतील, तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, असे मत रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडले आहे. उल्हासनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असताना ते बोलत होते. भाजप पक्षात गुंडांना प्रवेश दिला जात असल्याबाबत रामदास आठवलेंचं मत विचारलं असता, ते म्हणाले, “मी गुंडांच्या विरोधात आहे. मात्र, गुंड राजकारणात येऊन सुधरत असतील, तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. मात्र, त्यांना उमेदवारी दिली गेली नाही पाहिजे.” रामदास आठवले उल्हासनगरमध्ये खासगी कामानिमित्त आले होते. मात्र, यादरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहर रिपाइं अध्यक्ष भगवान भालेराव यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन उपस्थितांशी आठवलेंचा संवाद घडवून आणला. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी याला भाजप प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे, असे आठवलेंना विचारले असता, ते म्हणाले, ओमी कलानी किंवा अन्य कोणाला भाजप पक्षात घेत असेल तर त्यांचा वैयक्तीक प्रश्न असेल. VIDEO : पाहा काय म्हणाले रामदास आठवले?