मुंबई : मालाडमध्ये झालेल्या टोईंगच्या वादानंतर वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांनी टोईंगबाबत नवी नियमावली जारी केली आहे. यात गाडी टोईंग करण्यापूर्वी जर गाडीचा मालक आल्यास आणि तिथून गाडी काढल्यास त्याला कोणत्याही दंडाविना सोडण्यात येईल. तसंच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरुन गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे.


गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह अन्य शहरांमध्ये टोईंगवाल्यांच्या मुजोरीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मालाडमध्ये महिला असलेल्या कारचं टोईंग केल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतर टोईंगबाबत नवी नियमावली बनवण्यात आली आहे.

नव्या नियमावलीप्रमाणे प्रत्येक टोईंगच्या गाडीसोबत पोलिस उपनिरिक्षक दर्जाचा अधिकारीही तैनात करण्यात येणार आहे. गाड्या टोईंग करण्याआधी आता पोलिसांना भोंग्यावरुन जाहीर करावं लागणार आहे. जर गाडी टोईंग करत असताना गाडीचा मालक आला तर ती गाडी सोडून देण्यात येईल असाही नवा नियम लागू करण्यात आला आहे.

काय आहे नवी नियमावली :

गाडी टो करण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना देण्यात येईल.

टो करण्यापूर्वी चालक आल्यास गाडी सोडून देण्यात येईल.

टोईंगच्या गाडीतील प्रत्येक अधिकाऱ्याकडे ई-चलन उपकरण आणि वॉकी-टॉकी देण्यात येईल.

गाडी टो कऱण्यापूर्वी भोंग्यावरुन सूचना देणं बंधनकारक असेल.

टो करण्यापूर्वी चालक येऊन गाडी घेऊन गेल्यास गाडी दंडाशिवाय सोडून देण्यात येईल.

गाडी टो करताना चालक आल्यास फक्त दंड आकारता येईल, मात्र टोईंग चार्जेस आकारता येणार नाहीत.

टो केल्यानंतर चालक आल्यास दंड आणि टोईंग चार्जेस आकारुन गाडी सोडून देण्यात येईल.