ठाणे : एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप आहे. पण त्यासाठी रेल्वेचा रास्तारोको करणं हा काही उपाय नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मात्र आताताईपणा केला जातोय.


कळवा स्टेशनवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात थोड्याच वेळात आंदोलन केलं जाणार आहे. मात्र या आंदोलनामुळे ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास होणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन मागे घ्यावं, अशी मागणी केली जात आहे.

चेंगराचेंगरीत मुंबईकरांचा बळी

एलफिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर शुक्रवारी सकाळी मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले. सकाळी 9.30 च्या सुमारास फूट ओव्हर ब्रीजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली. यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रीज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रीजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

संबंधित बातमी : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांचा आकडा 23 वर