याबाबत बोलताना गणेश नाईक म्हणाले की, ''जकात, एलबीटीऐवजी जीएसटी येत आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अधिकाराखाली असल्याने, आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण मी नवी मुंबईकरांना सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे किमान 20 वर्ष घरपट्टी आणि पाणीपट्टी वाढू देणार नाही. त्यानुसार 13 वर्ष ही वाढ होऊ दिली नाही. यापुढेही 7 वर्ष मालमत्ता कर वाढणार नाही,'' असं ते यावेळी म्हणाले.
सध्या नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणी बिलात वाढ न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. या शिवाय आगामी काळात शहरातील पालिका रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी आणि रुग्णांना मदत मिळण्यासाठी नगरसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिकेत भाजपचं वर्चस्व वाढत आहे. गणेश नाईकांनी करातील सुटीसंदर्भात केलेल्या घोषणेला भाजपच्या वाढत्या वर्चस्वाची किनार आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.