ठाणे : मुंब्रा बायपासचं काम सुरु असेपर्यंत ऐरोली आणि मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर टोल वसुली बंद पाडली.


यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा बायपासचं काम सुरु आहे. त्यामुळे ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

वाहतूक कोंडीने मनस्ताप

मुंब्रा बायपासचं काम सुरु झाल्यापासून वाहनचालक वाहनकोंडीने वैतागले आहेत. टोलनाक्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून लांबच लांब रांगा लागत आहेत. सायन-पनवेल हायवेवर खारघर टोलनाक्यावर आज सकाळी मुंबईत येणाऱ्या वाहनांची कळंबोलीपासून म्हणजे साधारणपणे तीन किमी रांग होती. हीच परिस्थिती मुलुंड आणि ऐरोली भागात आहे. त्यामुळे टोलवसुली बंद करण्याची मागणी होत आहे.

पुढील दोन महिने मुंब्रा बायपास बंद

पुढील दोन महिने मुंब्रा बायपास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या वाहतुकीचा ताण पुढी दोन महिने ऐरोली, शिळफाटा मार्गावर पडणार हे निश्चित आहे.

उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात, मात्र हा रस्ता धोकादायक झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील अवजड वाहतूक दुपार आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येणार आहे.