मुंबई : एकीकडे राज्यात शिवसेना-भाजप युतीत सत्तास्थापनेवरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली असताना विरोधी पक्षांची मात्र बैठकांची लगबग सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नाशिक दौऱ्यानंतर आज मुंबईत प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. काल काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन आले आहेत. या बैठकीत शिवसेनेने पाठिंबा मागितला तर काय भूमिका असावी याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Continues below advertisement


या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी आपल्या घरी प्रमुख नेत्यांची बैठक बोलवली. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आज देखील शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार ही भूमिका घेतल्याने सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. शरद पवार यांच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलं. अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे की अजित पवार यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे?


याधी काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे वर्ष 2003-2004 मध्ये दिल्लीतून येऊन मुख्यमंत्री झाले होते. त्याआधी ते लोकसभेत होते. पृथ्वीराज चव्हाण हे देखील केंद्रात पीएमओमध्ये मंत्री असताना आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांचा राजीनामा झाल्यावर त्यांना राज्यतील मुख्यमंत्री पदाची जबादारी मिळाली होती. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आता विधीमंडळात नसलेल्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


दरम्यान आज एबीपी माझाच्या कट्ट्यावर संजय राऊत यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं. अजित दादा यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता आहे. मात्र दुर्दैवाने ते मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होत राहणार की नेमकं राज्यात मुख्यमंत्री होण्याची संधी कोणाला मिळणार, कुणाची सत्ता येणार?