मुंबई : देशात निष्पाप मुस्लिमांच्या हत्या होत असताना बघ्याची भूमिका घेणं हे लज्जास्पद आहे, असं मत प्रख्यात लेखिका नयनतारा सहगल यांनी व्यक्त केलं. मुंबईत साहित्यिक आणि वाचकांच्या मेळ्यामध्ये सहगल बोलत होत्या.


नयनतारा सहगल यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटकपद रद्द झाल्यानंतर साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली होती. याबाबत सहगल यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे मुंबईत आल्यावर नयनतारा काय बोलणार, याची उत्सुकता लागली होती.

अपेक्षेप्रमाणेच सहगल यांनी 'त्या' वादाचाही थोडक्यात समाचार घेतला. व्यक्तीस्वातंत्र्यावर येत असलेल्या निर्बंधांवर नयनतारा यांनी चिंता व्यक्त केली. देशात प्रत्येकाला वागण्या-बोलण्याचं स्वातंत्र्य हवं, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. देशात निष्पाप मुस्लिम नागरिकांच्या होत असलेल्या हत्यांबाबत आपण पुढे येऊन बोललं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.

देशातील वातावरण फारसं चांगलं नाही. 'हम हिंदुस्थानियत को नही छोडेंगे' असं म्हणत नयनतारा सहगल आपल्या भाषणाचा शेवट केला. दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातले दिग्गज उपस्थित होते.