Nawab Malik on Sameer Wankhede : एनसीबीचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी पत्रकार परिषदांचं सत्र सुरुच ठेवलंय. आजही पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंविषयीचा आणखी एक दाखला आणि मोठा गौप्यस्फोट मलिकांनी केला आहे. वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला मलिकांनी सादर केला. त्या दाखल्यामध्ये समीर वानखेडेंचं नाव समीर दाऊत वानखेडे असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल असंही नवाब मलिकांनी स्पष्ट केलंय. 


"समीर वानखेडेंचा फर्जीवाडा आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. शेजारी राहणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याशी वानखेडेंचा वाद झाल्यानंतर त्यांच्या मुलाला खोट्या आरोपांखाली फसवण्याचं काम केलं. त्यांनी एनडीपीएस कोर्टात दाखल केलेल्या जामीन अर्जात आयपीएस अधिकाऱ्यानं मागणी केली आहे की, त्या इमारतीतील सीसीटीव्ह तपासून पाहा. त्यांच्या घरी कोणताही छापा पडला नाही. वानखेडे आणि त्यांचे अधिकारी त्या इमारतीच्या आवारात फिरत होते. मुलाला घरातून बोलावून घेतलं आणि बोगस केस करुन ड्रग मिळाल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला.", असं स्पष्टीकरण देत पुन्हा एकदा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप लावले आहेत. 


पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "ज्या मुलीशी लग्न करुन घटस्फोट दिलाय. वाद निर्माण झाल्यानंतर ती मुलगी समोर येऊन समीर वानखेडेंचं सत्य समोर आणेल. या भितीपोटी एका ड्रग पेडलरच्या माध्यमातून त्या मुलीच्या मामेभावाजवळ ड्रग पोहोचवण्यात आलं. त्यानंतर राज्य सरकारची एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्याचं कटकारस्थान रचलं. आजही तो मुलगा तुरुंगात आहे. त्याला अडकवल्यानंतर त्याला समीर वानखेडे धमकी देत होते. जर माझ्याविरोधात बोलण्यासाठी तुम्ही समोर आले, तर संपूर्ण कुटुंबाला मी तुरुंगात टाकेल. अशी दहशत यांनी निर्माण केली होती."


"समीर वानखेडेंच्या वडिलांनी एक कोटी 25 लाखांचा मानहानीचा दावा माझ्याविरोधात दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी म्हटलं की, एक आमदार असताना, एका पक्षाचा प्रवक्ता असताना याची पडताळणी करणं गरजेचं होतं. उच्च न्यायालयानं दिलेल्या या निर्णयानंतर आम्ही महानगरपालिकेचे सर्व दस्तावेज तपासून पाहिले. आम्ही सर्व कागदपत्र उपलब्ध करुन घेतले. त्यानंतर आम्ही आमच्याकडे असणारे पुरावे कोर्टाकडे सादर केले आहेत. आज दुपारी याबाबत सुनावणी पार पडणार आहे.", अशी माहिती नवाब मलिकांनी दिली. 


"समीर वानखेडे खोट्या नोटांचे देखील खिलाडी आहेत. 14 कोटी 56 लाख रुपये खोट्या नोटा पकडण्यात आले होते. त्यावेळी यांनी 8 लाख रुपये केवळ दाखवले होते. त्यांनी त्यावेळी संबंधित लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता.", असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे. 


भाजपच्या मदतीनं अनिल देशमुखांविरोधात तक्रार : नवाब मलिक 


नवाब मलिकांनी बोलताना भाजपवरही टीका केलीये. नवाब मलिक म्हणाले की, "आमचं स्पष्ट मत आहे की, "अनिल देशमुख यांना अडकवण्यात आलं आहे. हे सगळं प्रकरण वाझे आणि परमबीर यांनी केलं आहे. कारण या दोघांनी सरकारला अंधारात ठेऊन गैर कृत्य करत होते. ज्यावेळी विधान भवनात हे प्रकरण समोर आलं त्यावेळी या दोघांना लक्षात आलं की आपल्याला अटक होणार आहे. त्यामुळे यांनी भाजपच्या नेत्यांना हाताशी धरून अनिल देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. हा राजकीय डाव होता."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


जन्मदाखल्यानंतर समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात व्हायरल