Navneet Rana vs Shivsena : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदुत्व आणि हनुमान चालिसा या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु असल्याचं दिसत आहे. अशातच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. आज सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मुंबईतील वांद्रे येथे असणाऱ्या मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे काल (शुक्रवार) पासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. नवनीत राणांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


कितीही विरोध झाला तरी आज मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. आम्हाला होणाऱ्या विरोधाची पर्वा न करता आम्ही हनुमान चालिसा वाचणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलेल्या दाम्पत्यानं अमरावती पोलिसांना गुंगारा देत मुंबई गाठली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पत्रकार परिषद घेत मातोश्रीवर जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. 


काय म्हणालं राणा दाम्पत्य?


आमदार रवी राणा यांनी कालच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की, "मातोश्रीवर हनुमान चालिसा मुख्यमंत्र्यांनी वाचावी. राज्यावर आलेले संकट, साडेसाती हनुमान चालिसा वाचल्यानंतर दूर होईल. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. त्या हिंदुत्वाची आठवण करून देण्यासाठी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही हनुमान चालीसा पठणावर ठाम आहोत. दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर आमचं स्वागत केलं असते. तर, एक वेळा नाही 100 वेळा वाचायला सांगितलं असते. आम्ही कायदा सुव्यवस्था पालन करू, मुंबईकराना कुठलही त्रास देणार नाही असेही रवी राणा यांनी म्हटले. आमचे कार्यकर्ते जे येणार होते, त्यांना मी सांगतो कोणी मुंबईत येऊ नका, आम्हाला मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, असेही त्यांनी म्हटलं."