नवी मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उष्णता वाढल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे.  उत्पादन घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात 40 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.


ऑक्टोबर हीटमुळे भाजीपाला करपला आहे. परिणामी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामुळे राज्यातून येणाऱ्या भाजीपाल्याची वाशीच्या एपीएमसी मार्केटमधील आवक कमी झाली आहे. एपीएमसीमध्ये एरव्ही 600 ते 650 भाजीपाला गाड्या येतात, पण सध्या फक्त 500 गाड्याच दाखल होत आहेत. याचा परिणाम भाज्यांच्या किंमतीवर झाला आहे.

किरकोळ मार्केटमधील भाजीपाला दर थेट 100 रुपयांच्या पार गेला आहे. वाटाणा तर प्रतिकिलो 200 रुपयांवर पोहोचला आहे. उकाड्याची हीच स्थिती कायम राहिल्यास भाजीपाला दर कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.