नवी मुंबई : मुंबईतील मराठा मोर्चासाठी पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा आणि कोकणातून हजारोंच्या संख्येने येणाऱ्या वाहनांमुळे मुंबईमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नवी मुंबईत पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. हार्बर रेल्वे मार्गावर येणाऱ्या स्थानकांच्या बाहेर पार्किंग करून मोर्चेकऱ्यांना रेल्वेने मुंबईत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


मुंबई मराठा क्रांती मोर्चा टीमने मुंबईमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र वाहनं जास्त येणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई टीमने वाहनांची पार्किंग व्यवस्था वाशीतील मधील एपीएमसी मार्केटमध्ये केली आहे. मोर्चा 11 वाजता सुरू होणार असल्याने रात्रभर प्रवास करून लोक सकाळी नवी मुंबईमध्ये पोचतील. किंवा काही जण 8 ऑगस्टच्या रात्रीसुद्धा पोचण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यातील वाहनांसाठी कोणतं स्टेशन?

नवी मुंबईमध्ये हार्बर रेल्वे लाईन आहे . मुंबई -पुणे महामार्गाला लागून सर्व रेल्वे स्टेशन आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या समोरील मैदानात वाहनांची पार्किंग करण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्याला रेल्वे स्थानकं वाटून देण्यात आली आहेत. मोर्चेकरी पार्किंग करुन हार्बर लाईनने मुंबईला जाण्यासाठी रवाना होतील. पार्किंगच्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेने टॉयलेट वाहनांची व्यवस्था केली आहे.

  • सातारा, सांगली, कोल्हापूर - वाशी एपीएमसी मार्केट

  • पुणे , सोलापूर - खारघर रेल्वे स्थानक, सेंट्रल पार्क मैदान

  • अहमदनगर - खांदेश्वर रेल्वे स्थानक

  • औरंगाबाद – मानसरोवर (कामोठे) रेल्वे स्थानक

  • रायगड , रत्नागिरी, सिंधुदुर्ग - नेरुळ , सीवूड्स रेल्वे स्थानक, तांडेल मैदान

  • बीड - सानपाडा रेल्वे स्थानक, दत्त मैदान

  • परभणी जिल्हा - वाशी रेल्वे स्थानक, महाराष्ट्र सदन


वाहतूक सुरळीत रहावी यासाठी पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. सायन - पनवेल हायवे आणि ठाणे - बेलापूर हायवेवर मोठा वाहतूक पोलीस फाटा तैनात करण्यात येणार आहे. जे लोक रेल्वेने प्रवास करतील त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस रेल्वे स्थानकाच्या आवारात मदतीसाठी असतील.