माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शेजारी राहणाऱ्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. शारदा माळी यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्यांना फासावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावून लटकवून हत्या केल्याचा आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विट्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.
मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपींची आणि मयत महिलेच्या कुटुंबाचे भांडण झाले होते. याचा राग मनात धरत आरोपी गोपाळ पाटील , हनुमंत पाटील यांनी आपल्या घरातील तीन महिलांना घेवून शारदा माळी यांच्या घरात प्रवेश केला. घरात त्या एकट्या पाहून त्यांची हत्या करून आरोपी फरार झाले. दरम्यान राज्यात एका आठवड्यात महिलांची निघृणपणे हत्या करण्याच्या चार घटना घडल्या असून हा महाराष्ट्राला कलंक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा पोलिसांवर वचक राहिला नसल्याचाही आरोप देखील भाजपा प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केला आहे.