अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकले, आरोपीची कबुली
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 01 Mar 2018 07:27 PM (IST)
अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन लाकूड कापण्याच्या मशिनने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर ते वसईच्या खाडीत फेकून दिले, अशी कबुली आरोपी महेश पळणीकरने दिली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेपत्ता पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. बिद्रे यांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले आणि वसईच्या खाडीत टाकले, अशी धक्कादायक कबुली आरोपी महेश पळणीकर याने दिली आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणाची उकल अंतिम टप्प्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, चालक कुंदन भंडारी आणि मित्र महेश पळणीकर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई क्राईम ब्रँचकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत अश्विनी बिद्रे प्रकरणी फक्त अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता चौघा आरोपींविरोधात हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 11 एप्रिल 2016 रोजी चौघा आरोपींनी एकत्र येऊन हत्या केल्याची माहिती आहे. तीनच दिवसांपूर्वी पळणीकरला लाकूड कटर मशिन घरात ठेवल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी बोलावलं होतं. महेश पळणीकर हा अभय कुरुंदकरचा बालपणीचा मित्र असून तो कुरुंदकरचे सर्व व्यवहार करत असे. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून सोमवारी अटक करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी तपास गुन्हे शाखेकडे देऊन तपास अधिकारी बदली झाल्यावर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. मात्र नंतर याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपी समोर आले असल्याचा दावा अश्विनीचे पती राजू गोरे यांनी केला आहे. नेमकं काय प्रकरण आहे? 15 एप्रिल 2016 पासून अश्विनी राजू गोरे या महिला पोलिस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी तिला बेपत्ता केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या तपासात पोलिसच त्याना सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील एक महत्त्वकांक्षी तरुणी अश्विनी जयकुमार बिद्रे या 2000 साला पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या. याचदरम्यान त्यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील तरुण राजू गोरे यांच्यासोबत झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलिस उपनिरिक्षक पद मिळालं.