नवी मुंबई : खारघरवासियांना अखेर रिक्षाचालकांनी दिलासा दिला आहे. गेल्या 8 दिवसांपासून बंद असलेल्या रिक्षा उद्या सकाळी 11 वाजता सुरु होणार आहेत.


खारघर-तळोज्यातील रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला आहे. उद्या सकाळी पोलिस उपायुक्त, पनवेल आरटीओ आणि खारघर रिक्षा युनियन, तळोजा रिक्षा युनियनची बैठक होणार आहे. या बैठकीत कुठल्या परिसरातील प्रवासी कुणी न्यायचे यावर तोडगा निघणार आहे.

खारघरचा वाली कोण? आठवड्यापासून रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल


हद्दीच्या वादातून आठवडाभरापूर्वी खारघर रिक्षा युनियन आणि तळोजा रिक्षा युनियनच्या दोन रिक्षाचालकांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. त्यानंतर तळोजा आणि खारघरमधल्या रिक्षा चालकांनी बंद पुकारला. या संपाचा फटका खारघरवासियांना बसला होता. तब्बल 8 दिवस प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

काय आहे प्रकरण?

मागील आठवड्यात मंगळवारी (21 नोव्हेंबर) खारघर रेल्वे स्थानकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये मारहाण झाली होती. या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली.

या विरोधात खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पाळला. तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करुन मारहाण केली असतानाही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला.