मुंबई : ''राज्यसभेवर जाण्याचा निर्णय माझ्यासाठी एक संधी म्हणून पाहतो. त्याबद्दल भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. दिल्लीला जाण्याने कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, कारण ते माझे कार्यकर्ते आहेत,'' असं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी स्वतः स्पष्ट केलं.


राज्यसभेसाठी 12 मार्च रोजी अर्ज भरणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली. ''मी दिल्लीला चाललोय, पाकिस्तानला नाही, असं म्हणत कार्यकर्ते नाराज होणार नाहीत,'' असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजपच्या चिन्हावर राज्यसभेवर जाणार का, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

''शिवसेनेच्या दबावामुळे राज्यसभेवर जाण्याचा प्रश्न नाही. मी स्वतःच्या मर्जीने जात आहे,'' असं त्यांनी सांगितलं.

''भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलो तरी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध कायम राहिल,'' असंही राणेंनी स्पष्ट केलं.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून भाजप कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

राज्यसभेसाठी भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचंही नाव पुढे आलं आहे.  एकनाथ खडसे आरोपांच्या जंजाळात अडकल्यापासून मंत्रिमंडळापासून दूर आहेत. त्यामुळे भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याचं एकप्रकारे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहे.

संबंधित बातमी :

राज्यसभेवर भाजपकडून जावडेकर-राणेंसोबत एकनाथ खडसे?