मुंबई : नारायण राणेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर एनडीएला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याची राणेंना काहीशी घाई झाल्याचं चित्र आहे. मंत्र्यांचा उल्लेख राणेंनी 'मंत्रिमंडळातील आमचे सहकारी' असा केल्यामुळे तटकरेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हशा पिकला.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या 30 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित समग्र या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात पार पडलं. भाषणाच्या सुरुवातीला मंचावर उपस्थित नेत्यांची नावं घेताना राणे यांनी मंत्री महादेव जानकर आणि जयकुमार रावल यांचा उल्लेख ‘मंत्रिमंडळातील आमचे सहकारी’असा केला.

राणेंच्या वक्तव्यानंतर मंचावर असलेल्या सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आणि सभागृहात हशा पिकला. राणेंचा पक्ष एनडीएत जाणार असून राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच राणेंनी जानकर-रावल यांना सहकारी बनवून टाकलं आणि भाषणात उल्लेख केला.

तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं


सिंचन घोटाळ्याचा डाग लागलेले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत मंचावर बसण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे. तटकरेंवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला फडणवीसांनी हजेरी लावली नाही.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र विरोधात असताना सिंचन घोटाळ्यांवरुन ज्यांच्या अटकेची मागणी फडणवीस यांनी केली होती, तेच आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.

मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं टाळलं असलं तरी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीष बापट यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला नारायण राणे यांचीही उपस्थिती असल्यानं त्यांच्यासोबत मंचावर बसण्याचं शिवसेनेच्या संजय राऊतांनीही टाळलं आहे.

हा कार्यक्रम सुरु होण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविंद्र नाट्य मंदिराबाहेर निदर्शनं केली आणि कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतलं. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या तटकरेंच्या कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी कसे उपस्थित राहतात, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.