मुंबई : ‘या निवडणुकीमुळे काँगेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येतील असं वाटत नाही आणि एकटं लढून जिंकता येत नाही. अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच पराभव आहे. यातून राहुल गांधी काय शिकतात हे पहावं लागेल.’ अशा शब्दात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.


दरम्यान, याचवेळी राणेंनी शिवसेनेवरही टीका केली. ‘शिवसेनेनं ४१ जागा लढवल्या. पण यश अजिबात आलं नाही. अपशकुन करायची उद्धव ठाकरेंची सवय आहे. पण त्याचा गुजरात निवडणुकीमध्ये काही परिणाम झाला नाही.’ अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर टीका केली.

‘मला विश्वास होता की, भाजप जिंकेल. हा विजय नरेंद्र मोदींचा आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो. राहुल गांधी एकटे लढले पण त्यांचे बाकीचे सहकारी सोबत दिसले नाही.’ असं म्हणत राणेंनी काँग्रेसच्या पराभावर आपलं मत व्यक्त केलं.

‘या निवडणुकीचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही उलट महाराष्ट्रात भाजपला निवडणूक सोपी जाईल.’ असंही राणे यावेळी म्हणाले.