मुंबई: रत्नागिरीतील नाणार प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री नाणार प्रकल्पावरुन मुख्यमंत्र्यांना घेरण्याच्या तयारीत आहेत.


बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीच.  त्याआधी सेनेचे मंत्री सुभाष देसाईंच्या दालनात जमले होते.

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आक्रमक झाले आहेत. ‘मस्ती आली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच’, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. काल नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.

मात्र त्यानंतर लागलीच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

नाणार देणार नाही: उद्धव ठाकरे

"नाणार देणार नाही", असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार केला.

उद्धव ठाकरे यांनी आज नाणारमध्ये जाहीर सभा घेत, नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला.

कोकणाला उद्ध्वस्त केलं, तर तुम्हाला उद्ध्वस्त करु. नाणारचा प्रकल्प शिवसेना होऊ देणार नाही, त्यासाठी नाणारवासियांची एकजूट कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

संबंधित बातम्या

नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही : मुख्यमंत्री 

नाणार प्रकल्प गेला, तो होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे 

नाणारची जमीन आधीच मारवाडी, गुजरातींना कशी मिळते? : राज ठाकरे