मुंबई : नालासोपारा इथं 23 जुलै 2018 ला झालेलं जोगिंदर राणाचं 'ते' एन्काऊंटर नक्की खरं होतं का? कारण पोलिसांची ही कारवाई स्वसंरक्षणार्थ होती असं सध्यातरी वाटत नाही, असं मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात राज्य सीआयडीला चौकशीचे आदेश दिलेत. या संदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पोलिसांच्या एकंदरीत भूमिकेवर अनेक सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे हायकोर्टानं सीआयडी चौकशीसोबतच राणावर लावलेल्या आरोपांबाबत न्यायालयीन चौकशीचे आदेश देत वसई दंडाधिकाऱ्यांकडूनही अहवाल मागवला आहे. या खटल्याची सुनावणी 10 डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आलीय.


नालासोपाऱ्यात 23 जुलै रोजी पोलीस चकमकीत ठार झालेल्या जोगिंदर राणा याला बनावट चकमकीत मारल्याचा आरोप करत त्याच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. दत्ता माने यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या केलेली ही चकमक खोटी होती आणि पोलिसांनी नियोजनबद्धरित्या त्याची हत्या केल्याचा आरोप त्याचा भाऊ सुरेंद्र राणा यानं याचिकेत केला आहे. मनोज सकपाळ आणि मंगेश चव्हाण या दोघांवर हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा, या दोघांसह त्यांच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल लोकेशन, सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणीही हायकोर्टाकडे करण्यात आलीय.

जोगिंदर राणाने पोलिस हवालदारावर चाकूने हल्ला केला, असे पोलिस सांगतात. जर माझ्या भावाने चाकूने हल्ला केला तर चाकूला रक्त का लागले नव्हते?, हल्ल्यात पोलीस हवालदार मनोज सकपाळ जखमी होऊन अतिदक्षता विभागात दाखल असल्याचे पोलिस सांगतात. मात्र तो छायाचित्रात घटनास्थळी उभा आहे, बुटाची लेस बांधत असताना दिसत आहे. तसेच मंगेश चव्हाण आणि मनोज सकपाळ या दोघांनीच राणाचा मृतदेह रिक्षात घालून नेतानाचे पुरावेही सादर केले आहेत असे अॅड. माने यांनी हायकोर्टाला सांगितले.

तसेच या घटनेनंतर पोलिसांनी त्या परिसरातील दुकानदारांना धमकावून सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही या याचिकेतून करण्यात आलाय. त्यादिवशी या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी आधी राणाकडे पैशांची मागणी केली. आणि त्यानं पैसे देण्यास नकार करत प्रतिकार केला तेव्हा गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोपही याचिकेतून करण्यात आलाय.

जोगिंदर राणा ऊर्फ गोपाल राणा याची नालासोपारा पूर्वेच्या राधानगर इथं 23 जुलै 2018 ला पोलिस चकमकीत हत्या करण्यात आली. राणा हा सराईत गुंड होता. त्याच्यावर वांद्रे, खार, सांताक्रूझ, जुहू, कांदिवली आणि अर्नाळा पोलीस ठाण्यात ३७ गुन्हे दाखल होते. त्यात चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांचा समावेश होता. त्यातील बहुतांश गुन्ह्यांत तो शिक्षा भोगून आला होता. विरारमधील अर्नाळा पोलीस ठाण्यातही त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता.