मंदिर-दर्ग्यात भेद न करणाऱ्या तृप्ती देसाईंना सलाम : जावेद अख्तर
एबीपी माझा वेब टीम | 29 Apr 2016 06:48 AM (IST)
मुंबई: समतेसाठी लढणाऱ्या स्त्रीने मंदिर आणि दर्ग्यात भेद केला नाही, त्यामुळे तिच्या लढ्याला मी सलाम करतो, अशा शब्दात गीतकार जावेद अख्तर यांनी तृप्ती देसाई यांचं कौतुक केलं आहे. जावेद अख्तर यांनी ट्विट करुन भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचं कौतुक केलं आहे. "तृप्ती देसाई यांच्याविरोधात भेदभाव झाला असला तरी, त्यांनी समतेच्या लढ्यात मंदिर आणि दर्ग्यात फरक केला नाही, अशा समतावादी नेत्या तृप्ती यांना सलाम", असं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं. तृप्ती देसाईंचं आंदोलन मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात काल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी प्रवेशासाठी आंदोलन केलं. मात्र, मुस्लिम नेत्यांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यानंतर देसाई यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याकडे वळवला. त्यावेळी पोलीस आणि भूमाता समर्थकांमध्ये काही काळ झटापटही झाली. याप्रकरणी तृप्ती देसाईंविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला आणि त्यांची रवानगी पुण्यात केली. मुंबईतल्या हाजीअली दर्ग्यातल्या मजारमध्ये महिलांना प्रवेश दिला जात नाही. यासंदर्भात निर्णय कोर्टात देखील प्रलंबित आहे.