मुंबई: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी अभिनेता नाना पाटेकर यांचं कौतुक करत आभार मानलं आहे. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेतल्याने, संजय निरुपम यांनी नानांचे आभार मानले.


संजय निरुपम यांनी एबीपी माझाच्या ट्विटला कोट करत,  “फेरीवाल्यांच्या अडचणी समजून घेऊन, त्यांच्या संघर्षाला साथ देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अभिवादन” असं  म्हटलं आहे.

https://twitter.com/sanjaynirupam/status/926670340591255552

नाना पाटेकर यांनी मुंबईतील व्हीजेटीआयच्या कार्यक्रमात फेरीवाल्यांची बाजू घेतली. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता, असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला.

भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? : नाना पाटेकर

नाना म्हणाले, “मला वाटतं फेरीवाल्यांची यात काहीच चूक नाही. फेरीवाले आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी दोन वेळच्या भाकरीसाठी ते काम करणारच. आपण त्यांची भाकरी हिरावून घेऊ शकत नाही.


यामध्ये खरंतर आपली चूक आहे, आपण महापालिकेला, प्रशासनाला इतके दिवस फेरीवाल्यांना जागा का दिली नाही? याबाबत का विचारलं नाही? म्हणजे याला आपणच जबाबदार आहोत. फेरीवाले नाही”.

संजय निरुपम यांची भूमिका

मुंबईतील फेरीवाल्यांच्या बाजूने संजय निरुपम यांनी आंदोलन सुरु केलं आहे. त्यासाठी त्यांनी मुंबईत फेरीवाला सन्मान मार्चही काढला होता.

राज ठाकरे विरुद्ध संजय निरुपम

एलफिन्स्टर दुर्घटनेनंतर मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात मनसेने मोर्चा उघडला आहे. अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यासाठी राज ठाकरे यांनी रेल्वे आणि प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतरही फेरीवाल्यांना न हटवल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली.

... तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम

मनसेच्या या पवित्र्यानंतर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने भूमिका घेतली.

फेरीवाल्यांसाठी महापालिकेने धोरण निश्चित करावं, त्यांना बसण्यासाठी जागा द्यावी, त्यानंतर त्यांना हटवावं अशी मागणी संजय निरुपम यांनी केली. त्यासाठी त्यांनी दादरमध्ये फेरीवाला सन्मान मार्च काढला. मात्र यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने, काँग्रेस आणि मनसेमध्ये झटापट झाली होती.

मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

मालाडमध्ये फेरीवाल्यांनी  मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांना जबर मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या माळवदे यांना उपचारासाठी कांदिवलीच्या ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आलं.

या संपूर्ण प्रकरणाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला होता. मनसेच्या तक्रारीनंतर संजय निरुपम आणि सात फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.



संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसेची गुंडगिरी : संजय निरुपम

... तर तुम्हालाही मार खावाच लागणार : संजय निरुपम


जैसी करनी, वैसी भरनी, संजय निरुपम यांचं मनसेला प्रत्युत्तर

नितेश राणेंचा मराठी ‘स्वाभिमान’ जागा, मनसेला पाठिंबा

फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला, आतापर्यंत काय काय झालं?

मनसे नेते संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात

दादरमध्ये मनसेकडून फेरीवाल्यांच्या स्टॉलची तोडफोड

मालाडमध्ये फेरीवाल्यांचा मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला