ठाणे : मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज (सोमवार) मध्यरात्रीपासून रस्तेदुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.


मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील अवजड वाहतूक दुपार आणि रात्रीच्या वेळेस ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे ग्रामीण आणि पालघर भागातून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने या भागात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हं आहेत.

उरणमधील जेएनपीटी बंदरातून नाशिक आणि गुजरातच्या दिशेने वाहतूक करणारी अवजड वाहनं मुंब्रा बायपास मार्गाचा वापर करतात, मात्र हा रस्ता धोकादायक झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

वाहतुकीत काय बदल?

घोडबंदर मार्गावर दुपारी 12 ते 4 या वेळेतही नियंत्रित पद्धतीने अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात येणार आहे. भिवंडीतून जेएनपीटीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मुंब्रा बायपासमार्गे प्रवेश बंद. या मार्गावरील वाहतूक मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, शहापूर, किन्हवली, सरळगाव, मुरबाड, कर्जत, चौकफाटामार्गे सोडण्यात येणार आहेत.

रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत भिवंडीतून मानकोली, मुंबई-नाशिक महामार्ग, रांजनोली नाका, येवई नाका, पाईपलाइन, सावद चौक, गंधारी पूल, आधारवाडी, दुर्गाडी सर्कल, पत्रीपूल, बदलापूर चौक, खोणी सर्कल, उसाटणे फाटा, तळोजा एमआयडीसीमार्गे, कळंबोली येथून प्रवेश.