मुंबई : मुंबईकरांच्या पाणीकपातीचा कालावधी यंदा आणखी लांबण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये फक्त 26 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं सध्या मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.


यंदा मुंबईतला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 3.74 लाख मिलीयन लीटर पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा 5.59 लाख मिलीयन लीटर इतका होता. दरम्यान,  पाणीपुरवठा आणि नियोजन विभागाचे पाणीसाठ्याच्या आणि येत्या पावसाळ्यातील पावसाच्या स्थितीवर बारीक लक्ष असेल, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं सांगितली आहे.

VIDEO | यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा स्कायमेटचा अंदाज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा



दरम्यान, स्कायमेटनं वर्तवलेल्या सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजामुळे मुंबईकरांच्या पाणीकपातीच्या कालावधीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. आधीच महाराष्ट्रातील 151 तालुके दुष्काळात होरपळत असतानाच आणखी चिंता वाढवणारा अंदाज स्कायमेटने दिला आहे. यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खाजगी वेधशाळेने वर्तवली आहे. यंदा दीर्घ कालावधीत सरासरीच्या केवळ 93 टक्केच पाऊस पडणार आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशामध्ये सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

स्कायमेट या खासगी वेधशाळेनं यावर्षीच्या पावसाबद्दल वर्तवलेलं भाकीत त्यातच मुंबईतील  पाणीकपात लांबण्याची शक्यता यामुळे आणखीनच चिंतेत वाढ करणारी आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव

  • भातसा

  • तुलसी

  • विहार

  • मध्य वैतरणा

  • मोडक सागर

  • ताणसा

  • अप्पर वैतरणा


VIDEO | यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज | मुंबई | एबीपी माझा