मुंबई : गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा चिमुकला नाल्यात पडून वाहून गेला. या घटनेनंतर आज मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाडेश्वरांनी एबीपी माझाशी बातचित करताना अशा घटनांना प्रशासनाप्रमाणे मुंबईकरही जबाबदार असल्याचे म्हटले आहे.


पावसामुळे तुंबलेल्या मुंबईलाही आलबेल म्हणणाऱ्या महापौरांनी, गोरेगावाच्या घटनेचं विश्लेषण करताना मुंबईकरांच्या 'सिव्हिक सेन्स'ला जबाबदार ठरवले आहे.

विश्वनाथ महाडेश्वर यांनी चिमुकला नाल्यात पडल्याच्या घटनेचे खापर मुंबईकरांवरच फोडलं आहे. अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढत असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

महापौर महाडेश्वर म्हणाले की, दिव्यांशच्या आईने त्याची काळजी घ्यायला हवी होती. तसेच गटारावरचं झाकण उघडं का होतं? स्थानिकांनी गटारावरचं झाकण तोडलं होतं का? प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हत का? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महापौर म्हणाले की, स्थानिक लोक अनेकदा गटारे तोडतात. गटारांमध्ये कचरा टाकण्यासाठी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढतात अथवा तोडतात. पालिका नेहमी विनंती करत असते, असे करु नका, परंतु काही लोक याची पुनरावृत्ती करत असतात. मुंबईकरांना सिव्हिक सेन्स नाही. मुंबईची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी आहे.

पाहा काय म्हणाले महाडेश्वर



दिव्यांशसाठी शोधकार्य सुरु असल्याची माहिती महाडेश्वर यांनी दिली. तसेच ते म्हणाले की, संपूर्ण नाला बंद आहे, परंतु त्याच ठिकाणी (जिथे दिव्यांश पडला) नाला उघडा का होता? याबाबत चौकशी करावी लागेल. पर्जन्य जलवाहिन्या विभागातील जे कोणी याप्रकरणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले आहेत.

 मुंबईत 2 वर्षाचा दिव्यांश सिंग नाल्यात पडून वाहून गेला | ABP Majha



2 वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला, स्थानिकांचा आंबेडकर चौकात रस्ता रोको | ABP Majha