मुंबई : ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे.


मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये समानाधानकारक पाऊस झाला नसल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी 17 टक्के पाणीसाठ्याचा तुटवडा आहे. त्यामुळे जूनअखेरला पाण्याचा राखीव कोटा वापरण्याची वेळ येणार आहे.

मुंबईकरांना येत्या जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केलं आहे. यावर्षी पाणीसाठा कमी असला तरी राखीव कोट्यातील पाणी वापरण्यात येणार असल्यामुळे जादा पाणीकपात केली जाणार नाही

महापालिकेने राज्य सरकारडून भातसा आणि अप्पर वैतरणातील राखीव कोट्याचा वापर करण्याची परवानगी घेतली आहे. यानुसार जुलैपर्यंत मुंबईकरांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी असला तरी जुलैपर्यंत पाण्याची चिंता नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरु करण्यात आली आहे.

पाणीसाठ्याची आजची स्थिती

3 मे 2018    -  427777  दशलक्ष लिटर

3 मे 2019    - 243051 दशलक्ष लिटर

तलाव        2019 (दशलक्ष लिटर) /   2018  (दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा         959       /  --------

मोडक सागर        44271       / 64394

तानसा        29374       / 35793

विहार        3481        / 8816

भातसा        118832       / 178976

तुळशी        2878        / 3055

मध्य वैतरणा        43256      /  136743