मुंबई : 9 हजार कोटी रुपयांचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याचं भारतात प्रत्यार्पण झालं, तर त्याची रवानगी आर्थर रोडमध्ये केली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या बॅरेकमध्ये मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला ठेवलं होतं, त्याच बॅरेक क्रमांक 12 मध्ये मल्ल्याला ठेवलं जाण्याची शक्यता आहे.


विजय मल्ल्याला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षितते संदर्भातला अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला.

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सजवळ असलेला आर्थर रोड तुरुंग 1925 मध्ये बांधण्यात आला होता. अधिकृतरित्या या कारागृहाची 804 कैदी ठेवण्याची क्षमता आहे, मात्र सध्या इथे अडीच हजार कैदी असल्याची माहिती आहे.

देशातल्या प्रमुख बँकांचं एकूण 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप विजय मल्ल्यावर आहे. आरोपींच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारत आणि इंग्लंडमध्ये 1992 सालीच करार झाला आहे. त्या कराराच्या मदतीनं विजय मल्ल्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काय आहे प्रकरण?

किंगफिशर प्रकरणात विजय माल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा माल्ल्यावर आरोप आहे.

मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

काही महिन्यांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.