मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाचे 31 जुलैपर्यंत निकाल लावण्याचं छातीठोकपणे आश्वासन देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे सपशेल तोंडघशी पडले आहेत. कारण आर्टस् आणि काही अभ्यासक्रमांचे निकाल 31 जुलैपर्यंत लावणं अशक्य असल्याचं खुद्ध विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनीच मान्य केलं.


निकालाच्या घोळाबाबत विधानपरिषदेच्या सभापतींच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु संजय देशमुख, शिवसेनेचे अनिल परब आणि इतर आमदार उपस्थित होते.

चुकीचे निकाल लावण्यापेक्षा अजून दोन दिवस वेळ घेतला तरी चालेल, असा बचावात्मक पवित्रा विनोद तावडे यांनी घेतला.

निकाल उशिरा लागणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुकावं लागले, त्याला जबाबदार कोण? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय अनिल परब यांनीही विनोद तावडेंसह विद्यापीठावर जोरदार टीका केली आहे.

दुसरीकडे मुंबई विद्यापीठांच्या शिक्षकांच्या मदतीला, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने मदतीचा हात पुढे केला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन केंद्रांवर 35 हजार पेपर तपासण्याची तयारी शिवाजी विद्यापीठाने दाखवली आहे.

दरम्यान, विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांचं नुकसान सुरूच आहे. कारण, आणखी 4 दिवस महाविद्यालयं बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक व्यस्त राहणार असल्यामुळे 31 जुलैपर्यंत कॉलेजेस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे पुढचे 4 दिवस कॉमर्स, आर्टस, आणि लॉच्या विद्यार्थ्यांना घरीच बसावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

पेपर तपासणीसाठी शिवाजी विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ मुंबई विद्यापीठाच्या मदतीला


पेपर चेकिंगसाठी मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद

मुंबईच्या 2 लाख उत्तरपत्रिका नागपुरात, तासाला 13 पेपर तपासावे लागणार!

31 जुलैपूर्वीच मुंबई विद्यापीठाचे निकाल, तावडेंचं आश्वासन