मुंबई : मूर्तीतून देव घडवणारे प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू बुधवारी देवघरी गेले, मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना याच मूर्तीरुपात जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विजय खातूंच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे सहा वाजल्यापासून खातू कुटुंबाने मूर्ती घडवण्याच्या कामात खंड पडू न देता स्वतःला झोकून दिलं आहे.


लालबागच्या सेंट्रल रेल्वे वर्कशॉपमधून आज बडोद्याची पहिली ऑर्डर बाहेर पडली. गेल्या रविवारी विजय दादांनी तसा शब्दच गुजरातच्या गणेशोत्सव मंडळाला दिला होता. आज दादा हयात नाहीत पण त्यांचा शब्द आहे तो फक्त त्यांच्या कुटुंबीयांच्या कामाप्रती असलेल्या आस्थेमुळे.

दरवर्षी या कारखान्यात जवळपास पाचशे मूर्ती घडतात. गणेशोत्सवात परळ-लालबाग, गिरणगावात बाप्पांच्या उंच मूर्तीं आकर्षणाचा विषय ठरतात. या सुबक आणि डोळ्यात प्राण असलेल्या सजीव मूर्ती घडवणारे विजय खातू आज नसले तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हे काम अविरतपणे सुरु ठेवलं आहे. सर्व मंडळांना बाप्पांच्या मूर्ती वेळेत पूर्ण करुन देण्याचा निश्चय या कुटुंबाने केला आहे.

महिन्याभरात गणेशोत्सवाची धामधूम आणि नवरात्रौत्सवाची तयारी सुरु होईल. खातू कुटुंबीयांनी दुःख बाजूला सारुन जिद्दीने स्वतःला सर्व कामात झोकून दिलंय. मात्र हीच परंपरा अविरत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ती वाढीव जागा उपलब्ध करून देण्याचं साकडं त्यांनी सरकारकडे घातलंय.