मुंबई : मुंबईतील खड्डे आणि शहराची तुंबापुरी होण्याचं खापर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पावसावर फोडलं आहे. मुंबईत पाऊसच इतका पडतो, त्याला आपण तरी काय करणार? असा उलटा सवाल त्यांनी विचारला.


मुंबई महापालिका कायम टीकेची धनी होते. जरा काही झालं की बीएमसीवर खापर फुटतं. मुंबईत पाऊस जोरात पडतो, त्याला महापालिका तरी काय करणार? संपूर्ण पावसाळा कुठेही पाणी न तुंबता जाईल, असा विश्वासही उद्धव यांनी व्यक्त केला आहे.

मुलुंडमध्ये कालिदास नाट्यगृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. गेल्याच आठवड्यात रेड एफएमची आरजे मलिष्कानं विडंबनपर गाणं करुन मुंबई पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्याला शिवसेनेच्या वतीनं किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातूनच उत्तर दिलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही सूचक उत्तर दिलं आहे.

मुंबईकरांसाठी अत्याधुनिक आणि आकर्षक कालिदास नाट्यगृहाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि मुंबई पालिकेचे आयुक्त अजॉय मेहता उपस्थित होते.