रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्याची शिवसेनेची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 18 Jul 2017 05:54 PM (IST)
मुंबई : 'मुंबई, तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय' या गाण्यामुळे चर्चेत आलेली आरजे मलिष्का हिच्यावर शिवसेना अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी 93.5 रेड एफएमवर 500 कोटींचा दावा ठोकण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर आणि अमेय घोले यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन रेडिओ वाहिनीवर कायदेशीर कारवाई करुन अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बीएमसीच्या बदनामीचं गाणं 93.5 रेड एफएम या खाजगी वाहिनीने करणं ही निंदनीय गोष्ट असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. सरवणकर आणि घोले यांनी पालिका आयुक्तांकडे पत्र दिलं आहे.
इस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे हे दोन्ही मुख्य रस्ते एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडीच्या अखत्यारित असताना त्याचं खापर पालिकेवर फोडल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकल ही रेल्वे खात्याशी म्हणजेच केंद्राशी निगडीत असताना त्याचं खापर आपल्यावर फोडल्याचंही पत्रात म्हटलं आहे.