मुंबई : गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्रात उतरणाऱ्या भक्तांना काळजी घेण्याची गरज आहे. मुंबईतील समुद्रात यंदा पुन्हा स्टिंग रे माशांचा उपद्रव पुन्हा सुरु झाला आहे. त्यामुळे रविवारी अनंतचतुर्दशीला गणेश विसर्जन करताना भाविकांनी काळजी घ्यावी.


गिरगाव चौपाटीवर टाकलेल्या जाळ्यांमध्ये स्टिंग रे मासे सापडले आहेत. या बातमीमुळे गणेश भक्तांनी घाबरुन जाऊ नये, परंतु विसर्जनाच्या दिवशी समुद्रात जाताना काळजी घ्यावी, असं आवाहन सागरी अभ्यासकांनी केलं आहे.

2013 मध्ये गणेश विसर्जनाच्या काळात स्टिंग रे माशांमुळे गणेश भक्तांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यावेळी सुमारे दीडशे गणेशभक्तांना स्टिंग रे माशांच्या शेपटीचा फटका (दंश) बसला होता.

स्टिंग रे माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे त्यांच्या शेपटीमध्ये न्यूरो टॉक्सिन असतं. त्यामुळे या माशांचा दंश झाल्यास तो वेदनादायक ठरतो. सध्या तरी त्यांचा वावर गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे.

काय काळजी घ्यावी?

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे बाप्पाची मूर्ती देऊन विसर्जन करावं.
पाण्यात जाताना गमबूटांचा वापर करावा
समुद्राऐवजी कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन करावं