Mumbai School Reopen : मुंबईत उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करा,  असे निर्देश पालिकेनं मुख्याध्यापकांना दिले आहेत. पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. मात्र शाळा सुरु होण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नसल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. अशातच मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी मुंबईतील शाळा उद्यापासूनच सुरु होणार असून शाळेबाबत कुठलाही संभ्रम पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी बाळगू नये, असं स्पष्ट केलं आहे. 


"15 डिसेंबरपासून शाळा सुरु करा, हे याआधीच शाळांना सुचित केले होते. मात्र तरीदेखील काही शाळांनी आजतागायत पाल्याला शालेत पाठविण्याविषयी पालकांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. ही बाब गंभीर असून पुन्हा नव्याने सूचना देण्यात येतील.", असं मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.  


15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु करण्याच्या सूचना मुंबई महापालिका शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिल्या आहेत. मुंबईतील प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय महापालिकेनं 30 नोव्हेंबरलाच घेतला होता. कोरोना प्रतिबंधक नियमावलीही त्यावेळी जाहीर करण्यात आली होती. मात्र शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक असताना शाळांकडून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पालकवर्गात संभ्रमाचं वातावरण होतं. 


राज्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्राथमिक शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे. मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी 30 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन 15 डिसेंबरपासून पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आठवड्याभरानंतर तडवी यांना पुन्हा शाळा सुरु होण्यासंदर्भात विचारणा केली असता, 15 डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरु करण्याच्या निर्णयात कोणताही बदल झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मुंबईतील बहुसंख्य पालक हे नोकरदार असून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे ते कामाच्या ठिकाणी रुजू झाले आहेत. 15 डिसेंबरपासून शाळा सुरु होणार असल्यास तयारीसाठी शाळांनी एक दिवस आधी पालकांना सूचित करणं आवश्यक असल्याचं पालकांचे म्हणणं आहे. मात्र काही शाळा अद्याप शिक्षण विभागाच्या नव्या सूचनांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे संभ्रमाचं वातावण निर्माण झालं होतं. 


"शिक्षण विभागाचे निर्णय हे आयत्या वेळी केव्हाही बदलतात किंवा एक दिवस आधी नव्या सूचना येऊन धडकतात. त्यामुळे काही शाळांनी 'वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका घेतली असावी. मुंबईत मागील काही दिवस संचारबंदीसारखे आदेश लागू होत असल्यानं पालकांच्या मनातही ओमायक्रॉनविषयी भीतीचं वातावरण निर्माण होत आहे.", अशी प्रतिक्रिया महामुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :