मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांचा तीळपापड झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.


राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लागेबांधे असल्याचा घणाघातही निरुपम यांनी केला आहे.  संजय निरुपम काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी खुलेआमपणे धमकी दिली. कायदा, मुख्यमंत्री यांना खुलं आवाहन दिलं. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. त्यांनी 15 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.

फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे


मनसेच्या कार्यकर्त्यांनी गरीब आणि परप्रांतीय फेरीवाल्यांवर हल्ला चढवला. मात्र पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. मनसेच्या गुंडगिरीचं मुख्यमंत्र्यांनी समर्थनच केल्याची टीका निरुपम यांनी केली.

ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड


एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसरातले फेरीवाले हटवण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम रेल्वे प्रशासनाला दिला होता. काल 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली. मनसेनं ठाणे, कल्याण, वसई, घाटकोपर रेल्वे स्थानकावर फेरीवाल्यांना हुसकावून लावले. फेरीवाल्यांचं सामान रस्त्यावर फेकून पुन्हा ठेले न लावण्याची तंबी दिली.

PHOTO : ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड


कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्यॅक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.