मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पहाटेपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे काल बंद असलेली तिन्ही मार्गावरील लोकलसेवा आता सुरु झाली आहे. रेल्वेसेवा सुरु झाल्याने रात्री वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर अडकलेले प्रवासी घराकडे रवाना झाले आहेत.


मध्य रेल्वे मार्गावर पहाटे 3.17 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन पहिली लोकल अंबरनाथच्या दिशेने रवाना करण्यात आली. त्यानंतर ठरावीक अंतराने कल्याण, कसारा, बदलापूर आणि कर्जतकरिता लोकल रवाना करण्यात आल्या.

मध्य रेल्वेपाठोपाठ हार्बर रेल्वेसेवादेखील सुरु झाली आहे. सकाळी 5.22 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलच्या दिशेना जाणारी लोकल रवाना झाली. त्यापाठोपाठ पनवेलहून सीएसएमटीसाठी लोकल सुरु करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वेसेवा नेहमीच्या वेळेनुसार सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवाही सुरु झाली आहे.

सकाळी 7.15 वाजता पश्चिम रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा सुरु करण्यात आली आहे. विरार-डहाणूदरम्यानची लोकलसेवा अद्याप बंद असून लवकरात लवकर यादरम्यानची लोकलसेवा सुरु करण्याचा पश्चिम रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.

दरम्यान, राज्यभरात अनेक ठिकाणी पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे ठाण्यासह कोकणातील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आपआपल्या जिल्ह्यांमधील पावसाची परिस्थिती पाहून शाळांच्या सुटीबाबतचा निर्णय घ्यावा, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.