मुंबई : आज मान्सूनची मुंबईमध्ये एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मान्सूननं मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेलं नसलं तरी रात्रीपासूनच पावसानं मुंबईत हजेरी लावली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अद्यापही हा पाऊस मुंबईच्या अनेक भागांत बरसतोय. मुंबईतील पश्चिम उपनगरं म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस बरसतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. 


महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात मंगळवारी सकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभाग (IMD)नं मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस असल्याचं सांगितलं आहे. 



दक्षिण-पश्चिम मान्सून आज मुंबईत दाखल होऊ शकतो. मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.


आयएमडीनं महाराष्ट्रात शनिवारी दक्षिण-पश्चिम मान्सून पोहोचणार असल्याची माहिती दिली होती. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनं शनिवारी रत्नागिरीत धडक दिली होती. मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असूनही मान्सूननं अद्याप मुंबईत धडक दिली नाही. असं असलं तरी मुंबईकरांना मात्र अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. कारण कालपासूनच मुंबईत मान्सूपूर्व पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तळकोकणात 10 ते 15 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा, या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश